मकरसंक्रांतीनिमित्त वार्षिक उत्सव व श्री गुरुदेव आपत्कालीन सेवा दल प्रकल्पाचे भव्य उद्घाटन
दिनांक १४ जानेवारी २०२६, बुधवार रोजी मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले. याच प्रसंगी श्री गुरुदेव आपत्कालीन सेवा दल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

दुपारी ०१.०० वाजता पंचक्रोशीतील गुरुदेवभक्तांच्या उपस्थितीत सत्संग भवन येथून गुरुपद गुंफा व महासमाधीपर्यंत भजन-नामगजरात भव्य रामधून काढण्यात आली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.



हा कार्यक्रम भू-वैकुंठ अड्याळ टेकडीचे मार्गदर्शक व संचालक श्री. सुबोधदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री वाल्मीकजी वैद्य गुरुजी (प्रांत सेवाधिकारी, वरोरा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमात श्री. सुधाकर गोवारदिपे (वरोरा), श्री. लालचंदजी नखाते (मोखारा) व श्री. बाबुरावजी ठवरे (पारडी) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नवलाजी मुळे (अध्यक्ष, अड्याळ टेकडी) यांनी केले, तर सुश्री. रेखाताई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
मार्गदर्शन करताना सुबोधदादा यांनी मकरसंक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. “सूर्य मकर राशीत प्रवेश करून दक्षिणायन संपवून उत्तरायणात प्रवेश करतो. दुःख, अज्ञान व अंधार म्हणजे दक्षिणायन, तर आत्मानंद, ज्ञान, वैराग्य व प्रकाश म्हणजे उत्तरायण” असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामसभा व पंचायत राज, मौन साधना शिबीर, आयुर्वेद, पंचगव्य तसेच योग-निसर्गोपचार शिबिर यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
श्री वाल्मीकजी वैद्य गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त वैद्य परिवारातर्फे कार्यक्रमासाठी अन्नदान करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी वैद्य गुरुजींचे मनःपूर्वक स्वागत केले.
यानंतर श्री गुरुदेव आपत्कालीन सेवा दल या प्रकल्पाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सेवादलासाठी शिवकालीन युद्धकला वस्ताद श्री. अक्षय कुळे गुरुजी व श्री. जोशेष वाढई गुरुजी यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या प्रकल्पासाठी सहयोग निधी कोश उभारणीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी हजारो रुपयांचे आर्थिक संकल्प नगदी स्वरूपात सुपूर्त केले. पुढे शांतीपाठ व प्रसाद वितरण करण्यात आले.
कार्यक्रमानंतर सर्व कार्यकर्त्यांनी टेकडीवरील दगड स्थानांतरणाचे श्रमदान करून आदर्श पायंडा कायम ठेवला. शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






